बुधवार, २७ मे, २०२०

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, जुनच्या पहील्या आठवड्यात होणार नव्या तारखा जाहीर


नवी दिल्ली, ता. २७ : दहावी-बारावीच्या राहीलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक सीबीएसई बोर्ड जुनच्या पहील्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन मुळे जे विद्यार्थी आपल्या गृह जिल्हा किंवा राज्यात गेले आहेत त्यांना आहे त्याच जिल्ह्यात परीक्षा देण्याची सवलत मिळणार असल्याची माहीती केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी दिली.

कोरोनामुळे सर्वच शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्याप्रमाणे सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुद्धा लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षा होतील की नाही या चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबत सीबीएसई बोर्डाने सुचना मागविल्या होत्या. आलेल्या सुचनांनुसार बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करुन केंद्रीय बोर्डाने विद्यार्थी आहे त्याच जिल्ह्यात परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला माहीती देऊन आपण आहे त्या जिल्ह्यात परीक्षा देऊ ईच्छितो याबद्दल सीबीएसई बोर्ड निर्णय घेईल व जुनच्या पहील्या आठवड्यात याबद्दल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणाची माहीती मिळेल असेही श्री. पोखरीयाल यांनी सांगितले. या परीक्षा १ ते १५ जुलैच्या मध्ये होण्याची शक्यता आहे.

नेपाळची अखेर माघार, भारताचा भुभाग दाखविला होता आपल्या नकाशात


नवी दिल्ली, ता. २७ : भारताचा काही भुभाग आपल्या नकाशात दाखविल्यानंतर भारताच्या प्रतिक्रियेनंतर नेपाळने अखेर माघार घेतली. या प्रकाराने भारताच्या मुत्सुद्देगिरीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे.

एकीकडे लद्दाखच्या सिमेवर भारत आणि चीनचे संबंध ताणले गेल्यानंतर नेपाळ सरकारने भारतीय हद्दीतील कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हा भुभाग नेपाळच्या नव्या नकाशात दाखविला होता. त्यानंतर दोन्ही देशामध्ये राजकीय व परराष्ट्रसंबंधामध्ये कटुता निर्माण झाली होती. भारताच्या वतीने विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही विनंती करतो की, नेपाळ सरकारने अशाप्रकारचे बनावट कार्टोग्राफीक प्रकाशित करु नये व भारताच्या क्षेत्रीय अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा आदर करावा. दरम्यान, घटना दुरुस्तीद्वारे प्रकाशित केलेला नकाशा देशाच्या संविधानात जोडण्याचा प्रस्ताव नेपाळच्या संसदेत मांडण्यात येणार होता. मात्र भारताचा रोष न ओढावता भारतासोबत द्विपक्षीय चर्चेतून हा मुद्दा सोडवावा असे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सुचविल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सहमतीने घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कामकाजातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हा वाद टाळून भारताबरोबरच नेपाळनेही मुत्सद्देगिरी दाखवून दिली.

पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी- योगेश हराळ

निल्लोड (ता. सिल्लोड) : सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्याक्षिक दाखविताना कृषी सहायक योगेश हराळ सोबत शेतकरी.

औरंगाबाद, ता. २७ : निल्लोड (ता. सिल्लोड) येथे कृषि विभागामार्फत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्याक्षिके बुधवारी (ता. २७) घेण्यात आली. बियाणांची उगवण क्षमता तपासुन पेरणी करावी असा सल्ला कृषि सहाय्यक योगेश हराळ यांनी शेतकर्‍यांना दिला आहे.

सोयाबीन हे स्वपराग सिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वानांचे आहे. दरवर्षी बदलाची आवश्यकता नाही. शेतकर्‍यांनी हे बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणीत बियाणांपासून उत्पादीत बियाणांची चाळणी करुन चांगल्या प्रतिच्या बियाणांची निवड करावी. उगवण क्षमतेनुसार पेरणी करता बियाणांचे प्रमाण ठरविता येऊ शकेल. यासाठी तीन पध्दती देण्यात आल्या आहेत. मातीमध्ये उगवण क्षमता तपासावी, कुंडीत बियाणे तपासावे, वर्तमानपत्राचा कागद वापरुन बियाणाची तपासणी करावी. उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी प्रमाणात असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावेत. जीवाणू संवर्धके व बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करुन ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी असा सल्ला कृषि विभागामार्फत दिला आहे.

तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्याक्षिक घेण्यात आली. या कार्यक्रमास कृषि सहायक विठ्ठल गोराडे, कृषिमित्र रविंद्र मगर, सुभाष आहेर, गिरजाराम खटाळ,  संतोष सहाणे आदी शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावली सहकारी पक्षांची बैठक, शरद पवार राहणार हजर


मुंबई, ता. २७ : राज्यात सुरू असलेल्या राजकीय  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आघाडीच्या पक्षांची बैठक बोलावली आहे.

 वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा वाढता आलेख व राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधीसह आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यानंतर बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत. 

Corona update : जिल्ह्यात आज ३० रुग्णांची वाढ, एकुण कोरोनाबधितांची संख्या १३६०


औरंगाबाद , ता. २७ : औरंगाबाद जिल्ह्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या १३६० एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापुर (०१), मिसारवाडी (०१), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (०१), शहानवाज मस्जिद परिसर (०१), सादात नगर (०१), भवानीनगर, जुना मोंढा (०१),जुना बाजार (०१),जहागीरदार कॉलनी (०१),ईटखेडा परिसर (०१),जयभिम नगर (०१), शिवशंकर कॉलनी (०२), सुभाषचंद्र बोस नगर (०४), अल्तमश कॉलनी (०१), शिवनेरी कॉलनी एन-९ (०१), टिळक नगर (०१), एन-४ सिडको (०१), रोशन गेट परिसर (०१), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (०१), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (०१), भाग्यनगर (०१),  जय भवानी नगर (०३), समता नगर (०१), सिल्लोड (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ०९ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना मीटर
एकूण रुग्ण १३६०
बरे झाले ४५९
मृत्यू ५९
उपचार सुरू ८४२

मंगळवार, २६ मे, २०२०

"बाजारात नका मारू येरझारा, उगवण तपासणी करुन घरचेच सोयाबीन पेरा" सिल्लोड तालुका कृषी विभागाचा उपक्रम

गेवराई शेमी (ता. सिल्लोड) : येथील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणे उगवण तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविताना कृषी सहायक सारिका पाटील.
औरंगाबाद ता. २६ : "बाजारात नका मारू येरझारा, उगवण तपासणी करा अन् घरचेच सोयाबीन पेरा" हे घोषवाक्याद्वारे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम तयारी पेरणीपुर्व बियाणे उगवण तपासणी प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
   कोरोनामुळे फिजिकल डिस्टसिंग पाळून तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शेमी (ता. सिल्लोड) येथे शुक्रवारी (ता. २२) कृषी सहायक सारिका पाटील यांनी शेतकरी छाया ताठे यांच्या शेतावर जाऊन पेरणीपूर्व तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. लॉकडाऊनच्या काळात गावात बैठका घेता येत नसल्यामुळे यंदाच्या खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारे सोयाबीन बियाणे खात्री करून घेण्यासाठी पद्धत गोणपाटाचे चौकोनी तुकडे करून तीन नमूने तयार करावे ते ओले करून त्यावर १०० दाणे मोजून ते दीड ते दोन सेमी अंतरावर १०-१० च्या रांगेत ठेवावे असे तीन नमुने तयार करावे व पाणी मारून वरून गोणपाट झाकून गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे व अधून मधून पाणी मारावे व सहा-सात दिवसानंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून १०० पैकी ७० दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर ते बाजारातील गुणवत्तेचे आहे असे समजावे व शिफारशीनुसार पेरणीसाठी वापरावे. पेरणी करताना बियाण्याला थायरम कार्बनडॅझीम किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकांची तसेच रायझोबियम, पिएसबी या जीवाणू संर्वधकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी १०० दाण्याचे तीन संच तयार करून काचेच्या तीन ग्लासात पाणी घेऊन त्यात ते दाणे टाकावे. पाच ते सात मिनिटानंतर दाणे वेगळे काढून त्यामधील पूर्णत फुगलेले व बियानाच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करा व मोजून घ्यावे. फुगलेले बियाणे टरफलात पाणी गेल्यामुळे पेरणीसाठी अयोग्य आहे व सुरकुत्या पडलेले पेरणीयोग्य आहेत असे समजावे.

'उत्पादन वाढीसाठी पेरणी करतांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राचा वापर करावा' - तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी 

राज्य सरकारमध्ये काँग्रेसला मोठया निर्णयाचे अधिकार नाहीत-राहुल गांधी

नवी दिल्ली, ता. २६ : ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
दोन दिवसापासून राज्यात होत असलेल्या हालचाली थंड होत नाहीत तोच राहुल गांधीच्या या वक्तव्याने वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी राहुल गांधी यांना भेटीची वेळ मगिल्याने या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे सरकार स्थिर असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना दिली आहे.
सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका तिन्ही पक्ष मिळून लढवू असा टोला खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची आघाडीच्या नेत्यांना भीती? विविध नेत्यांच्या राज्यपाल भेटीने तर्कवितर्क

 
 
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल

मुंबई, ता. २६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांसह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्या भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
   एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना राज्यपालांना सोमवारी (ता. २५) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार नारायण राणे, मिलिंद नार्वेकर, किरीट सोमय्या या नेत्यांनी वेगवेगळी भेट घेतली. या नेत्यांच्या भेटी गाठीचा नेमका अर्थ काय याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तत्पुर्वी संजय राऊत यांनी राज्यपालांना कमरेत वाकून घातलेला नमस्कार हा राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अनेक भेटी झाल्या मात्र राज्यापाल भेटीनंतर सोमवारी रात्री ही भेट सुमारे दिड तास सुरु होती. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.
  राष्ट्रपती राजवटीची भीती
  कोरोनाच्या वाढत्या आकड्याने राज्यात जी अस्वस्थता पसरली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शंका व्यक्त होत आहे. शांत असलेले भाजपचे नेते पडद्यामागून हालचाली करीत मध्यप्रदेश प्रमाणे राज्यात सुद्धा 'ऑपरेशन लोटस' राबवित असल्याची आघाडीच्या नेत्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना या नेत्यांचे फोन गेल्याची चर्चा आहे.  मात्र संजय राऊत यांनी सरकारला कोणताही धोका नाही चिंता नसावी असे ट्विट केले आहे.

Corona update- रुग्णसंख्या २२ ने वाढली एकूण १३२८


  
   औरंगाबाद , ता. २६ : औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या १३२७ एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
  औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना मोंढा (०१),  बायजीपुरा (०१), रोहिदासपुरा (०१), कांचनवाडी (०१), भारतमाता नगर हडको(०१), नवीनवस्ती जुनाबाजार (०४),  जुना हनुमान नगर (०१), हनुमान चौक (०१), न्याय नगर (०१), कैलाश नगर (०१), रामनगर (०१), एन-८ सिडको (०४), रोशन गेट (०४), एन-११ सुभाषचंद्र नगर (०१), पुंडलीक नगर (०१), भवानी नगर (०१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे.

सोमवार, २५ मे, २०२०

चव्हाण नांदेडला उपचाराची सुविधा उभी करू शकले नाहीत का? सोशल मिडीयावर चर्चा




औरंगाबाद, ता. २५ : कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुढील उपचारासाठी नांदेडहून मुंबईला गेल्याने सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.
अशोकराव चव्हाण हे राज्यातील कॉंग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखल्या जातात. गांधीघराण्याशी जवळचे संबध असल्याने राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आघाडी सरकारच्या काळात महसुल मंत्री, उद्योग आणि सांस्कृतिकमंत्री आणि आता सहा महिन्यांपासून सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी असताना नांदेडमध्ये व्यवस्थित उपचार होतील अशी व्यवस्था ते उभारू शकले नाही ह्याची त्यांना खात्री आहे?
तर मग सर्वसामान्य नांदेडकरांनी कोणत्या भरवशावर तिथे उपचार करावे अशा पोस्ट सध्या समाज माध्यमात फिरत आहेत. तर ही राजकारण करण्याची वेळ नाही. 'साहेब तुम्ही लवकर बरे व्हा... अशा पोस्ट सुद्धा फिरत आहेत.

अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना





औरंगाबाद, ता. २५ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पुढील उपचारासाठी कार्डियाक अम्ब्युलन्समधून सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता मुंबईला रवाना झाले. रविवारी (ता. २४) त्यांची आरोग्य विभागामार्फत कोरोनाची तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले होते.

सुरुवातीला कुणालाच याची माहीती नव्हते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कोरोना दोन रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल दिला. त्यात एक ६१ वर्षीय व्यक्ती शहरातील शिवाजीनगर भागातील असून, खासगी दवाखाण्यात उपचार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही व्यक्ती कोण याबद्दल अंदाज बांधण्याची चर्चा सुरु झाली आणि ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. परीसर, राहण्याचे ठिकाण, वय याचा संदर्भ घेत अंदाज व्यक्त करीत एकमेकांना फोन सुरु झाले. समर्थक आणि विरोधक एकमेकांना फोन करून खात्री करू लागले. काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे सुद्धा व्हॉट्सॲप, फेसबुकवर ‘साहेब, लवकर बरे व्हा..' असे संदेश धडकायला लागल्यानंतर विरोधकांनीही देखील आपल्या सदिच्छा व्यक्त केल्याने ती व्यक्ती कोण याची खात्री झाली. श्री. चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. नांदेडचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाच्या बैठका घेणे तसेच जिल्हाभरात फिरुन आढावा घेण्याचे काम केले. त्यानंतर मुंबईला गेलेल्या श्री. चव्हाण यांनी या काळात मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठकीसह नवनिर्वाचित विधानपरिषद आमदारांच्या शपथ कार्यक्रमाला हजेरी लावली. आठवडाभरानंतर नांदेडला परत आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
---

औरंगाबादेत एकाच दिवशी पाच कोरोनाबधितांचा मृत्यू, बळींचा आकडा ५५ वर




औरंगाबाद, ता. २५औरंगाबादेत एकाच दिवशी सोमवारी (ता.२५) पाच कोरोनाबधितांचा मृत्यू झाला असून, बळींचा आकडा ५५ वर गेला आहे.
२४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिलेचा तर गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरूषाचा रात्री ९.३५ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिला, कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय  महिलेचा सकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या मृतांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.
----
कोरोना मिटर
एकूण रुग्ण - १३०१
बरे झाले - ६३०
उपचार घेत आहेत  - ६२१
मृत्यू - ५५

गणपती बाप्पा मोरया

आजपासून मी ब्लॉगचा श्रीगणेशा करीत आहे

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख